प्रामुख्याने तळागाळातल्या मजुरांच्या, आदिवासींच्या संघर्षमय जीवनावर लेखन करणाऱ्या आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी आणि एका उच्च मध्यमवर्गीय नव्वदीतल्या म्हाताऱ्याची अफलातून कथा ‘अखेरचे आत्मचरित्र’मधून मांडणारे राजेंद्र बनहट्टी यांचा १४ जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या दिनमणीमध्ये त्यांचा थोडक्यात परिचय... .......
महाश्वेतादेवी
१४ जानेवारी १९२६ रोजी ब्रिटिश राजवटीतल्या बंगाल प्रांतात, ढाक्यामध्ये जन्मलेल्या महाश्वेतादेवी या बंगाली भाषेतल्या थोर कथाकार आणि कादंबरीकार! त्यांना लेखनाचं बाळकडू आई-वडिलांकडूनच मिळालं होतं.
त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण शांतिनिकेतनमध्ये झालं होतं. त्यांनी लेखनाबरोबरच आदिवासी आणि मोलमजुरांसाठी मोठं सामाजिक काम केलं होतं.
त्यांनी प्रामुख्याने स्थलांतरित मजूर, दलित, परित्यक्त्या स्त्रिया, आदिवासी आणि त्यांची पिळवणूक करणारा धनाढ्य जमीनदार वर्ग यांच्या संदर्भात लेखन केलं आहे. त्यांच्या बहुसंख्य कथा-कादंबऱ्यांचे इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार, रेमन मॅगसेसे पुरस्कार, तसंच साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले होते. तसंच ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केलं गेलं होतं.
झांसीर रानी, हजार चौरासीर मां, अग्निगर्भ, मूर्ती, निरेते मेघ, स्तन्यदायिनी, रुदाली असं त्यांचं साहित्य लोकप्रिय आहे. बिरसा मुंडा या आदिवासी क्रांतिकारकाच्या जीवन संघर्षावर आधारित असलेली ‘अरण्येर अधिकार’ ही त्यांची कादंबरी गाजली होती. (ती प्रभा तुळपुळे यांनी मराठीतही अनुवादित केली आहे).
२८ जुलै २०१६ रोजी त्यांचं कोलकात्यात निधन झालं.
.................
राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी
१४ जानेवारी १९३८ रोजी जन्मलेले राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी हे कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत.
जगण्याची चिवट इच्छा असलेल्या आणि आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या रसांचा मनापासून आनंद घेणाऱ्या एका उच्च मध्यमवर्गीय नव्वदीतल्या म्हाताऱ्याची अफलातून कथा मांडलेली त्यांची ‘अखेरचे आत्मचरित्र’ ही कादंबरी चांगलीच गाजली आणि वाचकप्रिय ठरली होती.
त्रैराशिक, समानधर्मा, खेळ, आंब्याची सावली, युद्धपर्व, कृष्णजन्म, तिघी, जीवन त्यांना कळले हो!, माणूस म्हणतो माजे घर गोष्टी घराकडील अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
पुण्यामध्ये २००२ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.